मान्सून यंदा केरळमध्ये 27 मे पर्यंत धडकणार!

नवी दिल्ली भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 13 मे पर्यंत दक्षिण अंदमानचा समुद्र ,बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि निकोबार बेटांपर्यंत मान्सून पोहोचणार असून तिथून वेगाने पुढे वाटचाल करत मान्सून केरळमध्ये 27 मे पर्यंत पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत पावसाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे दरवर्षी देशात मान्सूनचे आगमन कधी होणार याबाबत सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते .साधारण एक जून पर्यंत केरळात मान्सून पोहोचतो पण यंदा मान्सून केरळमध्ये 27 मे पर्यंत पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीप कल्पामध्ये मान्सूनपूर्व काळामध्ये पडणारा पाऊस, इंडोनेशिया वरील वरच्या थरातील उष्ण कटिबंधीय क्षेत्रीय वारा, ईशान्य हिंदी महासागरावरील खालच्या थरातील उष्ण कटिबंधीय क्षेत्रीय वारा, दक्षिण चीन समुद्रावरील थर्मल रेडिएशन उष्णकटिबंधीय ,वायव्य प्रशांत महासागरावरील समुद्रसपाटीचा सरासरी दाब हे तपासून भारतात मान्सून कधीपर्यंत पोहोचणार याचा अंदाज हवामान विभाग व्यक्त करीत असते .

यंदाही याच निकर्षाच्या आधारे हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाचे भाकीत वर्तवले आहे वातावरणात आयत्यावेळी काही बदल झाल्यास मान्सूनच्या आगमनात चार ते सात दिवसांचा मागेपुढेचा फरक पडू शकतो. केरळमध्ये मान्सून पोहोचल्यानंतर दहा दिवसात मुंबई आणि पंधरा दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होते.