केसरी पाटील यांचे निधन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : पर्यटकांना जगभर फिरवून आणणारे केसरी टूर्सचे संस्थापक आणि अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचे आज निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
‘पर्यटक देवो भव:’ या संकल्पनेतून केसरी पाटील यांनी वयाच्या ५० व्या वर्षी केसरी टूर्स या कंपनीची स्थापना केली होती. पर्यटनाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून केसरीभाऊ पाटील यांची ओळख निर्माण झाली होती. पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील मथाने गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात १९३५ साली त्यांचा जन्म झाला. शिक्षकीपेशात त्यांनी प्रारंभ काम केले. मात्र, मध्यमवर्गाला माफक दरात जग फिरण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी १९८४ मध्ये केसरी टूर्सची स्थापना केली. दादर-माहिम परिसरात त्यांनी पहिले कार्यालय सुरू केले. त्यानंतर ते कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाले. कंपनीच्या विस्तारासाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले आणि पर्यटन क्षेत्रातील सर्वोत्तम कंपनी म्हणून केसरी टूर्सचे नाव केले.