खाणीतले बचावकार्य चौथ्या दिवशी सुरूच

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
उमरंगसो (वृत्तसंस्था) : आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील बेकायदेशीर कोळसा खाणीत अडकलेल्या खाण कामगारांना शोधण्यासाठी गुरुवारी चौथ्या दिवशी देखील अनेक राज्य आणि केंद्रीय एजन्सींचे बचाव कार्य सुरूच आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आसामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे या खाणीत काम करणारे मजूर आतच अडकले. पावसाचे पाणी सुमामरे १०० फुटापर्यंत साचले होते. यातच काल एका कामगाराचा मृत्यू झाला. रात्रभर पाण्याचा निचरा केल्यानंतर शोध मोहीम पहाटे पुन्हा सुरू झाली आणि रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल (ROV) पूरग्रस्त खाण परिसराच्या आत नेण्यात आले आहे, असे आसाम पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.
आतापर्यंत, रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल द्वारे शोध घेताना काहीही आढळले नाही. अत्यंत प्रतिकूल आणि कठीण परिस्थिती असतानाही अडकलेल्या खाण कामगारांना शोधण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. खाणीच्या आत असलेले पाणी आता पूर्णपणे काळे झाले आहे आणि त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा शोध घेण्यास पथकाला अडचणी येत आहेत.