तिरूपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरीत ६ मृत्यू

वैकुंठ एकादशीच्या दर्शनाचे टोकन घेण्यासाठी रांगेत झाली चेंगराचेंगरी; मृतांमध्ये ५ महिला व १ पुरुष
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
आंध्रप्रदेश (वृत्तसंस्था) : तिरूपती बालाजी मंदिर परिसरात बुधवारी रात्री चेंगराचेंगरी होऊन सहा भाविकांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जण बेशुद्धही पडले आहेत.
तिरूपती विष्णू निवासम या निवासी परिसरात ही चेंगराचेंगरी झाली. वैकुंठ द्वार येथील दर्शनाचे टोकन मिळविण्यासाठी येथे भाविकांची गर्दी लोटली होती. त्यातच ही चेंगराचेंगरी झाली. १० ते १९ जानेवारीदरम्यान वैकुंठ दर्शनासाठी प्रारंभ होणार आहे. या कालावधीत तिरूपती बालाजी मंदिरात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या दर्शन काळासाठी मंदिर ट्रस्टने संपूर्ण तयारी केली होती. नियोजन झाले होते. गुरुवारपासून तिरूपतीमधील ९ केंद्रांमध्ये ९४ काउंटर्सवर वैकुंठद्वार येथील दर्शनाचे टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
घटनेनंतर मंदिर समितीचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी तातडीने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बैठक बोलावली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याची माहिती घेतली. भाविकांच्या मृत्यूबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
जखमींवर उपचार
दुर्घटनेतील ४० जखमींपैकी २८ जणांना रूईया रुग्णालयात तर १२ जणांना सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चार भाविकांचा रूईयामध्ये आणि दोघांचा सिम्समध्ये मृत्यू झाला.
गर्दी ओसंडण्याचे कारण काय?
वैकुंठ एकादशीच्या पार्श्वभूमीवर दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक या दिवसासाठी तिरूपती बालाजी मंदिरात दाखल होत असतता. या दर्शनासाठी मंदिर समितीकडून टोकन दिले जाते. गुरुवारी सकाळी पाच वाजल्यापासून ९ काउंटर्सवरून टोकन दिले जाणार होते. शुभ मुहूर्त साधण्यासाठी भाविकांनी टोकन काउंटर सुरू होण्यापूर्वीच गर्दी करण्यास सुरुवात केली होती. परिणामी बुधवारी सायंकाळी एका शाळेत असलेल्या केंद्रावर गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला शोक
तिरूपती बालाजी मंदिरातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे. जखमी भाविक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. तिरूपती येथील मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक भाविक जखमी झाले आणि काहींना आपले प्राण गमवावे लागले, ही अतिशय दुःखद घटना आहे. हे दुःख सहन करण्यासाठी मृतांच्या कुटुंबियांना बळ मिळो, तसेच जखमींना लवकर बरे वाटावे, अशी भावना त्यांनी एक्स द्वारे व्यक्त केली आहे.