खाणीत अडकलेल्यांपैकी एकाचा मृतदेह सापडला

आसाम खाण दुर्घटना; १०० फूट पाण्यात अजूनही ८ कामगार अडकलेले, मदकार्य सुरू
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
आसाम (वृत्तसंस्था) : आसाममधील उमरंगसो या ठिकाणच्या ३०० फूट खोल कोळसा खाणीमध्ये सहा जानेवारीपासून अडकलेल्या ९ कामगारांपैकी आज एका कामगाराचा मृतदेह बचावकार्यादरम्यान बाहेर काढण्यात आला. अजूनही येथे बचावकार्य आणि शोधकार्य सुरू आहे.
आसाममधील पावसामुळे अचानक खाणीत पाणी गेल्याने कामगार अडकले आहेत. उमरसंगो येथील तीन किलोमीटरच्या परिसरात असलेल्या आसाम कोळसा खाणीत सोमवारी अचानक पाण्याच्या प्रवाहामुळे मजूर अडकले होते. काल (मंगळवारी) या पाण्याची पातळी जवळपास १०० फुटांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे खाणीत अडकून बसलेल्या काही कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, राज्य आपत्ती निवारण पथक यांच्याकडून कालपासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराच्या पाणबुड्यांना बचावकार्य करत असताना एक मृतदेह सापडला, असे एनडीआरएफने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट एन. तिवारी यांच्या माहितीनुसार, २४ तास बचावकार्य सुरू आहे. त्यासाठी मोठी टीम तयार करण्यात आली आहे. संध्याकाळी शोध आणि बचावकार्य बंद करण्यात आले होते. सकाळी पुन्हा ते सुरू करण्यात आले. खाणीत १०० फूट पाणी असल्यामुळे नौदलाची सुद्धा मदत घेण्यात येत आहे.
(संदर्भ – पीटीआय)