माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह कालवश

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे आज (ता. २६) रात्री निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. भारताच्या अर्थव्यवस्थेत क्रांती घडवून आणण्यात, सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
डॉ. मनमोहन सिंह यांनी २००४ ते २०१४ या काळात भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. आर्थितक उन्नती बरोबरच सामाजिक सुरक्षेच्या योजना सुद्धा डॉ. मनमोहन सिंह यांनी राबविल्या. ते एक सर्वोत्तम पंतप्रधान होते, आणि याची नोंद इतिहासात केली जाईल, असे त्यांनी स्वतः नमूद केले होते. अनेकदा वादग्रस्त मुद्यांवर वाच्यता न करता शांत राहणे किंवा सर्वसामान्यपणे गप्प राहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. राजकारणातील सभ्यता, सुसंस्कृतता याचे उत्तम उदाहरण म्हणून मनमोहन सिंह हे काँग्रेसमधले मोठे व्यक्तिमत्त्व सांगता येईल. अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर असाही त्यांचा उल्लेख केला गेला होता. मात्र, स्वतः अर्थतज्ञ असलेल्या डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाच्या उन्नतीत मोठे योगदान दिले आहे. भारताच्या लोकशाहीला मजबूत करणारा पारदर्शकता हा पाया असला पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. सामान्य माणसाला माहितीचा अधिकार मिळवून दिला ते डॉ. मनमोहन सिंह यांच्याच सरकारने.
२००४ मध्ये ते यूपीए सरकार बहुमतात आल्यानंतर डॉ. मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. २००८ मध्ये अमेरिकेतल्या मंदीमुळे जगभरात मंदी आली होती. पण मनमोहन सिंह यांनी राबविलेल्या विविध धोरणांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला कोणताही आर्थिक फटका बसला नाही. त्यानंतर २००९ मध्ये ते पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले होते.