सेलिब्रिटींचे मतदान उत्साहात

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यास अवघा तासभर शिल्लक असताना सगळीकडे मतदानासाठी घरातून बाहेर पडा, असे आवाहन करण्यात येत आहे. बॉलिवुडच्या सेलिब्रिटींनी घराबाहेर पडून मतदान केल्यानंतर नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाल्यानंतर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अनेक सेलेब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर अनेकांनी मतदारांना आवाहन करुन लोकशाहीच्या या उत्सवात सामील होण्याची विनंती केली. अभिनेता कार्तिक आर्यन एका मतदान केंद्रावर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यानं नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित केले. तो म्हणाला, “मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यामुळे प्रत्येकाने जाऊन मतदान केले पाहिजे.”

अनुपम खेर, निकिता दत्ता, रीना दत्ता, शुभा खोटे आणि शर्वरी वाघ यांच्यासह इतर सेलिब्रिटींनीही मतदानाला हजेरी लावली. बॉलीवूड अभिनेता सोनू सूद, अक्षय कुमार, राजकुमार राव, रितेश देशमुख, जेनेलिया, फरहान अख्तर आणि अली फझल अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही आज दिवसाच्या सुरुवातीस मतदान केले.

निवडणूक हा मोठा उत्सव
मुंबईत एका मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर अभिनेता अनुपम खेर म्हणाले, “सर्व काही अतिशय व्यवस्थित आहे… अधिकारी सर्वांशी खूप छान वागत आहेत… स्वतंत्र देशात निवडणुकीपेक्षा मोठा उत्सव नाही. सामान्य माणूस त्यात असतो. मतदान करण्यापूर्वी त्याच्या रोजच्या गरजा लक्षात घ्या…जर आज कोणी मतदान केले नाही, तर त्यांना पुढील पाच वर्षात तक्रारी करण्याचा अधिकार नाही… ” असंही तो पुढे म्हणाला.

मतदान व्हावे सक्तीचे..
मतदानाला नागरिकांचा निरुत्साह दिसून येतो, असे साधारण आजचे चित्र दिसत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत सुद्धा पन्नास टक्क्यांपुढे मतदानाची टक्केवारी गेलेली नाही. त्यामुळे यापुढच्या काळात मतदान ही प्रक्रिया सक्तीची केली जावी, अशी मागणी अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा केली आहे.