स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर : अजित पवार

पुणे : सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. दोन्ही आघांड्याकडून आपणच अव्वल ठरणार, असा दावा केला जात आहे. मात्र, या आघाड्या केवळ विधानसभेपुरत्याच असल्याचं सध्या चित्र आहे. याचं कारण म्हणजे आज पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत, असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारावा अशी भूमिका अजित पवार यांची आहे.
पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण असे मेळावे घ्यायचे होते, पण ग्रामीण मेळावा होऊ शकला नाही, असे म्हणत अजित पवारांनी पिंपरीच्या मेळाव्यातील भाषणाला सुरुवात केली. आज गुरुपौर्णिमा आहे, मी सर्व गुरूंना वंदन करतो. काही अफवा पसरवल्या जातात, पुण्यात दीपक मानकर आणि पिंपरीमधील कार्यकर्ते सोबत आहेत. विकासासाठी आपण निर्णय घेतला, विरोधी पक्षात राहून आंदोलन करुन विकास होत नाही, प्रश्न सुटत नाहीत. काहीजण गेले, त्यांना स्वातंत्र आहे. आपल्याला पुणे शहरात जोमाने काम करावं लागणार आहे, वेळ फार कमी आहे. आपल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि आपण इथपर्यंत पोहचलो.
अनेकजण पक्षात आले आहेत, त्यांचं स्वागत करतो. अंदाज आहे की विधानसभा निवडणुका ऑक्टोबर शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबर पहिला आठवड्यात होतील, असे अजित पवारांनी म्हटले. मात्र, त्यासोबतच, लोकसभा- विधानसभा आपण एकत्र लढत असलो, तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत, अशी घोषणाकरुन त्यानी कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.