वर्षा विहारावर नियमांचे `ढग`

पुणे, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, आंबेगाव या पश्चिम घाटामध्ये वर्षा विहारासाठी पर्यटकांची गर्दी होत असून या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी आणि या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
केवळ वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांवर सायंकाळी ६ नंतर बंदी जिल्ह्यातील पर्यटनस्थळी सायंकाळी ६ नंतर कोणतीही बंदी नसून केवळ वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांवर सायंकाळी ६ नंतर बंदी असेल. पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाकडे याबाबत विचारणा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळी पर्यटकांना सायंकाळी ६नंतरदेखील तेथील नियमानुसार प्रवेश असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
- धबधबे, तलाव, नदी, डोंगराच्या कड्यांवर असलेल्या प्रेक्षणिय स्थळांच्याठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करुन सुरक्षिततेच्यादृष्टीने काही अंतरावर नियंत्रण रेषा आखावी व त्या नियंत्रण रेषेच्या पुढे पर्यटक जाणार नाहीत अशी व्यवस्था करण्यात यावी. तेथे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून सूचना फलक लावण्यात यावेत.
- प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य नसलेले संभाव्य आपत्ती प्रवण पर्यटनस्थळे, डोंगरकडे, धबधबे, पाण्याची साठवण असलेले क्षेत्र, ओढे इत्यादी पर्यटकांसाठी बंद करण्यात यावेत.
- भूशी, पवना लेक, लोणावळा, सिंहगड, माळशेज घाट, ताम्हिणी घाट इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्या ठिकाणी पर्यटकांसाठी ‘काय करावे आणि काय करु नये’ याबाबत सूचना फलक लावावेत.
- आपत्ती प्रवण जलपर्यटनाच्या ठिकाणी पट्टीचे पोहणारे, शोध व बचाव पथक, जीव रक्षक, लाईफ जॅकेटस्, लाईफ ब्वाईज, रेस्क्यू बोटी इत्यादी व्यवस्था तयार ठेवाव्यात.
- गिर्यारोहण, जलपर्यटन इत्यादी ठिकाणी त्या-त्या स्थानिक परिसरातील अशासकीय संस्था, गिर्यारोहक, एनडीआरएफ, यशदा व जिल्हा प्रशासनाद्वारे प्रशिक्षित आपदा मित्र, स्थानिक स्वयंसेवक इत्यादींची मदत घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करावी.
- त्या ठिकाणी जिवीत हानी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने प्रथोमपचार सुविधा असलेल्या रुग्णवाहिका यांचीदेखील व्यवस्था करावी.
- वाहतूकीस अडथळा होऊ नये आणि अपघात टाळण्यासाठी नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीतील पर्यटनस्थळी रस्त्यावरील, पदपथावरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, टपऱ्या इत्यादी काढण्याबाबत संबंधित मुख्याधिकारी, ग्रामसेवक यांनी तात्काळ कार्यवाही करावी.
- कोणत्याही परिस्थितीमध्ये पर्यटनासाठी वेळ निश्चित करुन सूर्यास्तानंतर पर्यटक तेथे थांबणार नाहीत याबाबत उपाययोजना करावी. आवश्यकता भासल्यास नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ते खटले दाखल करावेत.