मुंबई, विशेष प्रतिनिधी : अविमुक्तेश्वरानंद यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौत या मुख्यमंत्री शिंदेंसाठी मैदानात उतरल्या आहेत. कंगना रणौत यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की राजकारणात, युती, आघाडी, पक्ष व नेत्यांमधील करार आणि एखाद्या पक्षाचं विभाजन होणं अत्यंत सामान्य तसेच संवैधानिक (घटनात्मक) बाब आहे. १९०७ साली, १९७१ साली काँग्रेस पक्षाचं विभाजन झालं होतं. राजकारणी लोक राजकारणात राजकारण करणार नाहीत तर मग काय गोलगप्पे (पाणीपुरी) विकणार का?
कंगना यांनी काय म्हणलंय?
कंगना रणौत म्हणाल्या, शंकराचार्यांनी त्यांच्या शब्दांचा, प्रभावाचा आणि धार्मिक शिक्षणाचा गैरवापर केला आहे. धर्म असं सांगतो की, राजाच जर प्रजेचं शोषण करू लागला तर देशद्रोह हा शेवटचा धर्म आहे. शंकराचार्यांनी महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केला आहे. त्यांनी अपमानजनक शब्दांचा वापर करून मुख्यमंत्र्यांवर देशद्रोही, गद्दार व विश्वासघातकी असल्याचा आरोप करत सर्वांचा भावना दुखावल्या आहेत. शंकराचार्य अशा छोट्या आणि क्षुल्लक गोष्टी सांगून हिंदू धर्माची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत.
शंकराचार्य मुख्यमंत्र्यांबद्दल काय म्हणाले होते?
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले होते कोणाचं हिंदुत्तव खरं आणि कोणाचं खोटं हे जाणून घ्यावं लागेल. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही. जो सहनशील आहे, विश्वासघातही सहन करतो तेच खरा हिंदू असणार. ज्यांनी विश्वासघात केला ते हिंदू असू शकत नाहीत. उद्धव ठाकरेंबरोबर विश्वासघात झाला, ही बाब लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनही स्पष्ट झाली आहे. महाराष्ट्राच्या जनतेनेही मतपेटीच्या माध्यमातून तोच संदेश दिला आहे.