ठाकरेंच्या खेळीने शिंदे गट अस्वस्थ

मुंबई, प्रतिनिधी : विधानपरिषदेच्या 12 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा गटाने मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुती अस्वस्थ झाली आहे.
विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणुक होणार आहे. निवडूण येण्यासाठी 23 मतांचा कोठा ठरविण्यात आला आहे. महायुतीच्या सदस्य संख्येनुसार त्यांचे 9 उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यानुसार भाजपाने पाच, शिवसेना शिंदे गट दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट दोन असे उमेदवार जाहीर केले. महाविकास आघाडीच्या सदस्य संख्येनुसार दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शेकापचे जयंतराव पाटील यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेस पक्षाकडे एक उमेदवार निवडून येईल एवढे सदस्य संख्याबळ आहे.
महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी पाच ते सहा सदस्य कमी पडतात. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात असंतुष्ट सदस्य आहेत. पुन्हा स्वगृही परतण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. याचा फायदा उठविण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने संघटनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. नार्वेकर यांचा सर्व पक्षांतील नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटा बरोबर चांगले संबंध आहेत. नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे आपल्या उमेदवारांना धक्का बसू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने आपल्या आमदारांची बैठक घेऊन आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.