मावळ-मुळशीतील पर्यटनावर बंदी

पिंपरी, प्रतिनिधी : मावळ आणि मुळशी तालुक्यात कालपासून अतिवृष्टी सुरू आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटनास जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
मावळ व मुळशी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे सर्व पर्यटन स्थळे, धरणे व त्यासभोतालील परिसर, नदीपात्र धोकादायक स्थितीत आलेले आहेत. त्यामुळे जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारी (२५ जुलै सकाळी आठ वाजल्यापासून सोमवार (२९ जुलै) सकाळी आठ वाजेपर्यंत दोन्ही तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.सर्व पर्यटन स्थळी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. वन विभागाच्या अखत्यारीतील पर्यटन स्थळावर कायमस्वरूपी गार्डची नियुक्ती केली जाणार आहे. पुढील चार दिवसात पर्यटन स्थळे जाणाऱ्या पर्यटकांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार कारवाई केली जाणार आहे.
मावळ व मुळशी तालुक्यामध्ये बुधवार आणि गुरुवारी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे मावळ व मुळशी तालुक्यातील सर्व धरणाची पाण्याच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे मावळ व मुळशी तालुक्यातील नद्या, ओढे यांच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धबधब्यातील पाणी प्रचंड वेगाने वाहत आहे. तसेच अतिवृष्टीमुळे डोंगर दऱ्याचे उंच तडे, दगड माती यांचे भूउत्खलन होत आहेत.
लवासामध्ये दरड कोसळली
मागील काही तासांपासून पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस चालू असून अनेक ठिकाणी झाडे आणि भिंती पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अशामध्ये लवासा येथे दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये दोन बंगल्ंयावर दरड कोसळली असून २-४ जण बेपत्ता झाले आहेत.
पुणे जिल्ह्यात मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस झाला असून लवासा याठिकाणी ४५३ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.या विक्रमी पावसाचा फटका लवासा या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच या घटनेमुळे २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची खबर जिल्हा प्रशासनाला दिली आहे असे समजते.